दिवाळी
Diwali 2022
दिवाळी
यावर्षी दिवाळी दोनच दिवस - दाते पंचांगकर्ते
वर्षभरातील सर्व सणांमध्ये दीपावली हा सण सर्वात मोठा आनंददायी असा आहे. इतर सर्व सण - उत्सवांपेक्षा दिवाळीच्या चार दिवसात होणारी उलाढाल सर्वांनाच आनंद देणारी असते. याचे कारण नरक चतुर्दशी ते कार्तिक शु. प्रतिपदा या तीन दिवसांत जनतेने मौज मजा करावी, गोडधोड खावे, आनंदी वातावरणात रहावे अशी बळीराजाची इच्छा आणि त्याला मिळालेला वर यामुळे दिवाळीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. यावर्षी वसुबारस 21 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिककडील काही प्रदेशांत धनत्रयोदशी 22 ऑक्टोबर रोजी शनिवारी आहे तर सोलापूर, औरंगाबाद, मराठवाडा आणि विदर्भाकडील काही प्रदेशांत 23 ऑक्टोबर रोजी रविवारी धनत्रयोदशी आहे. (धनत्रयोदशी विषयी सविस्तर खुलासा दाते पंचांगात पान ८९ वर दिलेला आहे.) नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन 24 ऑक्टोबर रोजी सोमवारी एका दिवशी आलेले आहे. 25 ऑक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण असून हे ग्रहण भारतात सर्वत्र दिसणार आहे. ग्रहणाचे दुसरे दिवशी 26 ऑक्टोबर रोजी बुधवारी दिवाळी पाडवा व भाऊबीज एकाच दिवशी आहे.

या दिवशी सौभाग्यव्रती स्त्रीया एकभुक्त राहून (एकवेळ जेवण करून) सायंकाळी सवत्स म्हणजे वासरासह असलेल्या गाईचे खालील श्लोक म्हणून सूर्यास्तानंतर पूजन करतात.

ततः सर्वमये देवि सर्व देवैरलंकृते । मातर्ममाभिलषितं सफलं कुरू नन्दिनी ।।
अर्थ - हे सर्वात्मिक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर.

या दिवशी दूध, दूधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. आज शहरात अनेक ठिकाणी पूजनासाठी गाई उपलब्ध नसतात अशावेळेस गाय वासराच्या मूर्तिची देखील पूजा करता येते. ते ही शक्य नसल्यास गाईच्या चित्राची पूजा करता येते. मात्र अशा वेळेस गाईच्या गोग्रासाकरिता म्हणून आपल्या भागातील गोशाळेस शक्य ते सहकार्य करावे.

आश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी, यमराजाला प्रसन्न करण्याकरिता या दिवशी यमदीपदान केले जाते. घरातील अलंकार, सोने - नाणे स्वच्छ केले जाते. विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, गणेश, नाग, द्रव्यनिधी यांची पूजा केली जाते. अपमृत्यु म्हणजेच अकाली, अपघाताने मृत्यु येऊ नये याकरिता सायंकाळी कणकेचा दिवा दक्षिणेस ज्योत करून ठेवावा व घरातील प्रत्येकाने खालील श्लोक म्हणून दिव्यास नमस्कार करावा.

मृत्यूना पाशदंडाभ्यां कालेन श्यामयासह ।
त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यजः प्रीयतां मम ।।


धनत्रयोदशी दोन दिवस खुलासा - दि. 22 ऑक्टोबर 2022 रोजी शनिवारी द्वादशी समाप्ति सायं. ६:०३ आहे. सायंकाळी ६:०३ नंतर सूर्यास्त होत असलेल्या गांवी दि. 22 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे तर काही प्रदेशात दि. 23 ऑक्टोबर 2022 रोजी रविवारी धनत्रयोदशी आहे.
दि. 22 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी असलेली कांही प्रमुख गांवे - मुंबई, ठाणे, पुणे, नासिक, सांगली, सातारा, कोल्हापूरसह संपूर्ण कोंकण, गोवा, गोध्रा सोडून संपूर्ण गुजरात, कर्नाटकातील बेळगांव, शिरसी, उडपी, मंगळूर या प्रदेशात दि. 22 ऑक्टोबर रोजी शनिवारी धनत्रयोदशी करावी.
दि. 23 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी असलेली कांही प्रमुख गांवे - सोलापूर, नागपूरसह अकोला, अमरावती, अहमदनगर, इंदापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगांव, जालना, धुळे, नांदेड, परभणी, भुसावळ, यवतमाळ, लातूर, वर्धा कर्नाटकातील विजापूर, गुलबर्गा, बिदर, अथणी, हुबळी, धारवाड, बेंगळूर, म्हैसूर संपूर्ण तेलंगणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, जैसलमेर सोडून संपूर्ण राजस्थान, दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा, पंजाब या प्रदेशात दि. 23 ऑक्टोबर रोजी रविवारी धनत्रयोदशी आहे. (अधिक माहिती पंचांगात पहावी.)

नरकासुराने 16 हजार 108 स्त्रियांना आपल्या बंदीखान्यात डांबून ठेवले होते. हा नरकासूर प्रजेचाही खूप छळ करीत असे. भगवान श्रीकृष्णांनी या नरकासुराचा वध आश्विन कृष्ण चतुर्दशीला करून स्त्रीयांची मुक्तता केली. नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला की, आजच्या तिथीला जो मंगलस्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये. म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करणे महत्त्वाचे मानले आहे.
शरद् ऋतूचा शेवट आणि हेमंत ऋतूचे आगमन अशा संधीकालावर दिवाळीचा सण साजरा करताना पुढे येणाऱ्या थंडीच्या काळासाठी तेल लावून स्नान करण्याची सुरुवात नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नानापासून होते. नरक चतुर्दशीचे दिवशी यमतर्पण करावयास सांगितले आहे. पूर्वीपेक्षा सध्याच्या काळात वेगाने चालविल्या जाणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचे भय वाढले आहे. अपघात, धावपळीचे जीवन, इ. अनेक कारणांमुळे अपमृत्यूचा संभव वाढत असल्याने नरकचतुर्दशीला यमतर्पण करून अपमृत्यु निवारणासाठी यमाची प्रार्थना सर्वांनी करणे आवश्यक आहे. अपमृत्यु येऊ नये म्हणून यमाला खालील 14 नावांनी तर्पण करून त्याची प्रार्थना करण्यास सांगितले आहे. वडील हयात असलेल्यांनी पाण्यात अक्षता घालून व नसलेल्यांनी पाण्यात तीळ घालून खालील नावांनी तर्पण करावे. 1) यम 2) धर्मराज 3) मृत्यु 4) अंतक 5) वैवस्वत 6) काल 7) सर्वभूतक्षयकर 8) औदुंबर 9) दध्न 10) नील 11) परमेष्ठिन 12) वृकोदर 13) चित्र 14) चित्रगुप्त

शेतकऱ्यांसाठी ज्याप्रमाणे मार्गशीर्षातील वेळा अमावास्या शुभ आहे, त्याप्रमाणे व्यापारी वर्गासाठी आश्विनातील अमावास्या शुभ आहे. पुराणातील कथेप्रमाणे आश्विन अमावास्येस रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वच्छता, शोभा, आनंद आहे अशा ठिकाणी ती आकर्षित होते. म्हणून लक्ष्मीपूजनाचे दिवशी घर, दुकान झाडून, स्वच्छ करून, सुशोभित करून सूर्यास्तानंतर लक्ष्मी व कुबेर यांचे पूजन करून ऐश्वर्य, संपत्ति, समृद्धिसाठी प्रार्थना करावयाची असते.

नमस्ते सर्वदेवानां वरदाऽसि हरिप्रिये ।
या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात् ।।

अशी लक्ष्मीची प्रार्थना करावी आणि
धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपायच ।
भवन्तु त्वत्प्रसादेन धनधान्यादिसम्पदः ॥

अशी कुबेराची प्रार्थना करावी. यापूजेत समृद्धीचे प्रतीक म्हणून साळीच्या लाह्या आवश्यक असतात.

लक्ष्मीपूजन मुहूर्त (24 ऑक्टोबर 2022, सोमवार)
दुपारी ३:०० ते सायं. ६:००, सायं. ६:०० ते रात्री ८:३०, रात्री १०:३० ते रात्री १२:००


हे सूर्यग्रहण भारतात सर्वत्र ग्रस्तास्त दिसणार आहे म्हणजे ग्रस्त असलेले सूर्यबिंब अस्तास जाईल, त्यामुळे भारतात कोठेही ग्रहण मोक्ष दिसणार नाही. म्हणून आपल्या गावाच्या स्पर्शकालापासून आपल्या गावाच्या सूर्यास्तापर्यंत पुण्यकाल मानावा.
ग्रहणाचा वेध - हे ग्रहण दिवसाच्या चौथ्या प्रहरात लागत असल्याने मंगळवारच्या पहाटे ३:३० पासून सूर्यास्तापर्यंत ग्रहणाचा वेध पाळावा. बाल, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती आणि गर्भवतींनी मंगळवारी दुपारी १२:३० पासून सूर्यास्तापर्यंत वेध पाळावेत. वेधामध्ये भोजन करू नये. स्नान, जप, देवपूजा, श्राद्ध इ. करता येतील, तसेच पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग करता येईल. ग्रहण पर्वकाळात म्हणजे ग्रहण स्पर्श ते सूर्यास्त या काळात (मुंबईकरिता दुपारी ४:४९ ते सायंकाळी ६:०८) पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग ही कर्मे करू नयेत. भारतातील काही प्रमुख गावांच्या स्पर्श व मोक्षवेळा या प्रमाणे - (यादी)
या ग्रहणाचे वेध मंगळवारी पहाटे पासून असल्याने सोमवारी परंपरेप्रमाणे लक्ष्मीपूजन करून प्रसाद घेण्यास अडचण नाही. तसेच मंगळवारी सूर्यास्तानंतर वेध संपत असल्याने बुधवारी पहाटे दिवाळी पाडव्यानिमित्त केले जाणारे वहीपूजन देखील परंपरेप्रमाणे करता येईल. पाडव्यानिमित्त केले जाणारे सर्व धार्मिक उत्सव परंपरेप्रमाणे करता येतील. (अधिक माहिती पंचांगात पहावी.)
यापूर्वी 1995 मध्ये याच प्रमाणे 23 ऑक्टोबर रोजी नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन होते, 24 ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण होते. 25 ऑक्टोबर रोजी बलिप्रतिपदा आणि भाऊबीज आलेली होती. या नंतर 3 नोव्हेंबर 2032 मध्ये याच प्रमाणे दिवाळीमध्ये ग्रहण येणार आहे मात्र हे ग्रहण महाराष्ट्रातून दिसणार नाही, उत्तर भारतामध्ये दिसेल.

कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात. या दिवशी दानशूर अशा बळीराजाची पूजा करण्यास सांगितली आहे. ज्याप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदेस शालिवाहन शक नवे संवत्सर सुरु होते, त्याप्रमाणे कार्तिक शुक्ल प्रतिपदेस विक्रम संवत्सर सुरु होते. व्यापारी वर्षास सुरुवात होत असल्याने वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या दिवशी पत्नीने पतीस ओवाळावे म्हणजे दोघांचे ही आयुष्य वाढते.

वहीपूजन मुहूर्त (26 ऑक्टोबर 2022, बुधवार)
पहाटे ३:३० ते ६:३०, सकाळी ६:३० ते ९:३०, सकाळी ११:०० ते १२:३०

नरक चतुर्दशी, अमावास्या व बलिप्रतिपदा हे दिवाळीचे मुख्य तीन दिवस आहेत. मात्र या तीन दिवसांना जोडून येणारी भाऊबीज सुद्धा दिवाळीच्या दिवसात गणली जाते. कार्तिक शुक्ल द्वितीयेच्या दिवशी यमराज आपल्या बहिणीच्या हातचे भोजन करून बहिणीचा सत्कार करीत असे, अशी पुराणात गोष्ट आहे. म्हणून या दिवशी बहिणीने भावाला जेवावयास बोलावून त्याला ओवाळावे असे सांगितले आहे.
दिवाळीच्या या चार दिवसात सर्वत्र आनंदोत्सव साजरा करावयाचा असल्याने दीपमाळ, आकाशदिवे, दिव्यांची रोषणाई करून दीपोत्सव केला जातो. म्हणून या चार दिवसांना दीपावली किंवा दिवाळी असे म्हटले जाते.
वर्षभरातील इतर सण - उत्सव यांचे प्रमाणे दिवाळीचे स्वरूप नसते. सर्व समाजाने दुःख, भेदभाव विसरून चार दिवस आनंदात रहावयाचे असते. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण भारतात दिवाळी साजरी करण्याची पद्धति जवळजवळ सारखीच आहे. मुख्यत: घर, दुकान स्वच्छ करून, दिव्यांची रोषणाई, फराळाचे पदार्थ, गोडधोड पक्वान्न करणे, अभ्यंगस्नान, दिवाळीच्या निमित्ताने आप्तेष्टांनी एकत्र येणे इ. गोष्टी केल्या जातात पतीने पत्नीसाठी, भावाने बहिणीसाठी, मालकांनी कर्मचाऱ्यांसाठी भेटवस्तू देणे आणि स्नेहभाव दृढ करणे यामुळे संपूर्ण समाजात - कुटुंबात एकोपा राखला जातो.
प्रत्येक धर्मीयांच्या सण - उत्सवामुळे संपूर्ण भारतात खरेदी - विक्री होऊन आर्थिक उलाढाल वाढते अर्थातच त्यामुळे आर्थिक स्वास्थ्य प्राप्त होऊन भारताची प्रगति होण्यात या सण - उत्सवांचे मोठे सहकार्य लाभते ही गोष्ट निश्चितच लक्षात ठेवली पाहिजे.